शाळा सुटली तसा बंड्या धावत घरी आला. आल्या आल्या दप्तर फेकून देऊन तडक वडिलांपुढे जाऊन उभा राहिला. त्याचा हा अवतार पाहून वडिलांनाही नवल वाटलं. ते काही बोलायाच्या आतच बंड्या म्हणाला, ""बाबा, मला ही तुमची इस्टेट नको, तुमचा पैसा अडकाही नको. त्याची मला गरज नाही. मला विचारवंत व्हायचं आहे, त्यामुळं मी हे स्वखुशीने नाकारत आहे.''आता कुठं सातवीत गेलेलं आपलं पोरगं हे काय बोलतंय? असा प्रश्न सदाभाऊला पडला. त्यांनी समजुतीच्या सुरात त्याला विचारलं, ""आरं असं काय बोलतोय, असं एकदम काय झालं तुला? ही इस्टेट तुझ्यासाठी नाही तर मग कुणासाठी? मी काय वर जाताना बांधून नेणार आहे.?'' त्यावर बंड्या तत्परतेने म्हणाला, ""नाही बाबा नाही. आपल्या देशातील जनता दारिद्य्रात पिचलेली असताना मी ही इस्टेट कशी घेऊ?''
आता मात्र पोराला काही तरी झालं, याची सदाभाऊला खात्री पटली. शाळेतून येताना नाल्यातून यावे लागते. तिथं तर काही बाधलं नाही ना, की आणखी दुसरं काय झालं. अशा नाही नाही त्या शंका सदाभाऊच्या डोक्यात येऊन गेल्या. म्हणून त्यानं बंड्याला जवळ घेतलं. शेजारी बसवून बोलता झाला. ""कारं पोरा, बरं नाही का आज? शाळेत काय झालं का? आरं आल्या आल्या असं का बोलतोय?'' बंड्या पुन्हा त्याच ठामपणाने म्हणाला, ""नाही बाबा, मला काहीही झालेलं नाही. मी पूर्ण शुद्धीत आहे. शुद्ध हरपली आहे ती इतरांची. गरज नसताना जादा पगार घेणाऱ्यांची, जादा इस्टेट कमावणाऱ्यांची. पण मी मात्र माझा मार्ग निवडला आहे. मला ही इस्टेट नको म्हणजे नको.'' पोराचा हा ठामपणा पाहून सदाभाऊ आणखीच गोंधळात पडला. पोरगं नीट सांगत नाही म्हटल्यावर त्याने बापाच्या अधिकारात त्याला एक धपाटा लावून विचारलं. ""काय ते नीट सांगतोस की, देऊ ठेवून दोन तीन?''
धपाटा बसल्यावर बंड्या जरा भानावर आला. ""बाबा, आमच्या शाळेच्या गुरुजींना सगळे विचारवंत म्हणतात. केवढं मोठे नाव आहे त्यांचं. त्यांनी सरकारने देऊ केलेली पगारवाढ नाकारली होती. केवढं कौतुक झालं त्यांचं. गेली कित्येक वर्षे त्यांचा बोलबाला झाला. त्यांच्यावर पेपरातून हे मोठे लेख लिहिले गेले. त्यांचेही किती तरी लेख छापून आले. आमच्या शाळेतसुद्धा ते लेख वाचून दाखवत. आमच्या वर्गातली वेडी मुलं त्यावेळी खुशाल झोपा काढीत होती. मी मात्र, कान देऊन सगळं ऐकत होतो.'' बंड्या उत्साहानं सांगत होता. त्याचं बोलणं मध्येच थांबवत सदाभाऊ म्हणाले, ""आरं त्याचा आता इथं काय संबंध?'' बंड्याचा उत्साह पुन्हा बळावला आणि तो पुढे सांगू लागला ""हो तेच तर सांगतोय मी. सरकारनं आता पुन्हा पगारवाढ द्यायची ठरविली आहे. त्यामुळं आमचे गुरुजी पुन्हा नको म्हणतायत. आणि हो आता ते एकटे नाहीत. त्यांच्यासोबत आणखी काही समविचारी गुरुजीपण आहेत. त्यांनी म्हणे सरकारला कळविलं आहे की आम्हाला तर नकोच पण इतरांनाही देऊ नका. लायकीप्रमाणेच पगार मिळाला पाहिजे, असा त्यांचा विचार आहे. सरकारचा विनाकारण खर्च होऊ नये, उरलेल्या पैशातून गरिबांचे कल्याण व्हावं, म्हणून ते असं सांगत आहेत. त्यामुळं मी ही ठरविलं आहे की आपणही इस्टेट मागायची नाही. तुम्ही खुशाल गरिबांना वाटून टाका.''
आता काय झालंय ते सदाभाऊला कळाले. त्याने कपाळावरच हात मारून घेतला आणि म्हणाला, ""आरं असं पगार अन् इस्टेट नाकारून कोणी विचारवंत होतं काय? त्यानं घर कसं चालवायचं. घरच्यांचं खाणंपिणं शिक्षण कसं करायचं. का त्यासाठी पुन्हा एखादी सरकारी योजना हुडकून त्यात नाव द्यायचं? आरं विचारवंत होणं इतकं सोपं असतं का गड्या. हे खूळ तू डोक्यातून काढून टाक.''आपला मुद्दा वडिलांना पटतं नसल्याचे पाहून बंड्या जरा चिडलाच. तो म्हणाला, "" हाच फरक आहे सामान्य माणूस आणि विचारवंत यांच्यातला. तुम्ही सामान्य माणसं विचारच करू शकत नाहीत. आजची शिक्षण पद्धती चुकीची आहे. वर्षानुवर्षे तोच तो अभ्यासक्रम. सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. नवीन प्रयोग करण्याची कोणाची इच्छा नाही. नवे प्रयोग ग्रामीण भागात पोचत नाहीत. शिक्षक केवळ पगारामागे धावतात. शिकवण्याकडं त्यांचं लक्ष नाही. अशा स्थिती आपली शिक्षण व्यवस्था अडकली आहे. अन् त्याच असे तुमच्यासारखे पालक. मुलांना स्वतंत्र विचार करू देत नाहीत, त्यांच्यावर विचार व इच्छा लादतात. छे छे कसं व्हायचं या देशाचं?...'' बंड्याने आपल्या भाषणात पॉज घेताच सदाभाऊ बोलते झाले, ""आता जरा माझं ऐकतो का? तू एवढं टमाटमा बोलाय शिकला ते ह्याच शिक्षणामुळं ना. तुझा तो मास्तर बी याच शिक्षण पद्धतीतून शिकला ना? तू म्हणतो तसं विचारवंत जर याच शिक्षणातून होत असतील तर या पद्धतीला कशाला दोष देता रं? नांगर आडवा हाकल्यावर मशागत चांगली होत नसलं तर आमी त्यो उभा हाकला तर लगीच विचारवंत झालो का आमी? मी नांगर उभा हाकला तर इतरांनी पण त्यो तसाच हाकावा असं कसं म्हणायचं. त्यो काय स्टॅंडर्ड झाला काय? आरं अशी नांगर हाकायची वेळ येऊ नाही म्हणून तुला शाळेत घातला. म्हटलं पोरगं शिकून मोठं होईल, दोन पैसे मिळविल. त्याच्याबरोबर आपून बी सुखी होऊ. पण तू हे भलतंच काय घेऊन बसलाय. तुला एक सांगू का? असं कोणी पगार अन् इस्टेट नाकारल्यानं देशाची गरिबी हटणार नाही. त्यासाठी सगळ्यांना कमवायला शिकवलं पाहिजे. सगळे कमावते झाले की, गरीब आपोआप हाटलं बघ. त्यासाठी ज्यानी त्यानी आपलं काम आधी नीट केलं पाहिजे. कसं? पटतंय का तुला? आता मी पण नाही का वाटत विचारवंत?''
शेतात नांगर हाकणाऱ्या आपल्या वडिलांचे हे विचार ऐकून बंड्यातला विचारवंत ओशाळलाच. मघाशी फेकून दिलेलं दप्तर उचलून तो घरात पळाला.
Wednesday, March 18, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment